
नागपूर: मेट्रोची व्यावसायिक दौड नागपूर शहरात ७ मार्च रोजी सायंकाळी सुरू झाली.दुसऱ्या दिवशी आभार सेवा मेट्रोकडून प्रदान करण्यात आली, खापरी ते सीताबर्डी असा हा साढे तेरा किलोमीटरचा प्रवास उत्साहात सुरू झाला असलातरी प्रवाशांचा असा अनुभव आहे की ‘हम जब बाहर निकले तो धक्के से निकले!’ तर मराठी मेट्रो प्रवासी सांगत होता ‘मेट्रो झाली मुंबईची लोकल!’.
सर्वात महत्वाचे म्हणजे दिलेल्या वेळा-पत्रकानुसार नागपूरची मेट्रो धावलीच नाही, मेट्रोचे निर्धारित वेळा-पत्रक कधीचेच कोलमडले असल्याचे अनुभव प्रवासी व्यक्त करतात तर महिला प्रवासी हिने मेट्रो स्टेशनवर शौचालयच नसल्याने झालेली गैरसोय तीव्र शब्दात मांडली. स्वतःच्या शहरात मेट्रोचा आनंद घेण्याकरिता लोकांची झुम्बड मेट्रोत शिरली मात्र ‘आनंद’ या पेक्षा ‘अनंत त्रागा’ प्रवाश्यांनी अनुभवला. मेट्रोच्या या व्यावसायिक दौडला केंद्रीय रेल्वे मंत्रालयाचा रेल्वे सुरक्षा मंडळ तसेच रेल्वे सेफ्टी या मुंबईच्या संस्थेतून घाईघाईने सुरक्षिततेचे प्रमाणपत्र मिळाले ते आचार संहिता लागण्यापूर्वी उदघाटन होऊन गेले पाहिजे याच उद्देशाने दिले असावे,यात प्रवाश्यांचा विचार कुठेही करण्यात आला नसल्याची तक्रारही अनेकांनी केली.
११ हजार प्रवासी १.५५ लाख उत्पन्न-
पहिल्या दिवशीच्या व्यावसायिक मेट्रो सेवेचे उत्त्पन्न रु.१,५५,०००/- इतके होते ज्यामध्ये ११ हजार नागरिकांनी प्रवास केला.सिताबर्डी मेट्रो स्टेशन व्यतिरिक्त प्रवासी नागरिकांनी एयरपोर्ट मेट्रो स्टेशन, साउथ एयरपोर्ट मेट्रो स्टेशन, न्यू एयरपोर्ट मेट्रो स्टेशन आणि खापरी मेट्रो स्टेशन येथून व्यावसायिक मेट्रो सेवेचा लाभ घेतला. मेट्रो राईड मध्ये प्रत्येक वयोगटातील नागरिक,विविध सामाजिक संस्था,विदेशी पर्यटक हे देखील उपस्थित होते. पहिल्या दिवशी ११ हजार, दुसऱ्या दिवशी १२५०० तर तिसऱ्या दिवशीच्या व्यावसायिक मेट्रो राईड मध्ये तब्बल ११००० नागरिकांनी मेट्रोचा प्रवास अनुभवला
दिनांक ११ मार्च (सोमवार) मेंटेनन्स कार्याकरता मेट्रो सेवा बंद ठेवण्यात आली होती १२ मार्च(मंगळवार) पासून नागपूरकरांसाठी मेट्रो सेवा पूर्ववत करण्यात आली. फक्त चार दिवस मेट्रो चालवून मेंटनेन्ससाठी मेट्रो बंद ठेवण्यात येते यावरही अनेक प्रवाश्यांनी प्रश्न उपस्थित केले. मेट्रोमधील फक्त तीन डब्यांमध्ये प्रवास करण्यासाठी प्रवासी चक्क कॅब आणि खाजगी वाहनांनी येत असून मेट्रो स्टेशनवर वर खासगी वाहने पार्क करीत असल्याचे वेगळे दृश्यही बघावयास मिळत होते.
महिलांसाठी वेगळा डबाच नाही!-
मेट्रोकर नागपूरकर महिलांसाठी मेट्रोचा प्रवास हा ‘आल्हाददायक’ मुळीच नसल्याचे अनेक महिलांनी सांगितले. मेट्रो रेल मध्ये सध्यातरी दिल्ली,मुंबईच्या धर्तीवर महिलांसाठी आरक्षित डबा नसल्यामुळे महिला प्रवाश्यांना मेट्रोचा प्रवास मुळीच ‘आल्हाददायक’ न वाटता ‘त्रासदायकच’ वाटला. पुरुषांच्या सोबत दाटीवाटीने उभे राहण्याचा अनुभव त्यांनी विशद केला. महिलांसाठी वेगळ्या डब्याची व्यवस्था असावी अशी मागणी त्यांनी केली.
[-Dr Mamata Khandekar]
seinor Journalist



Subscribe to Awaz VIdarbha Nagpur