
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.सिद्धार्थविनायक काणे यांच्याविरोधात विद्यार्थी संघटनादेखील आक्रमक झाल्या आहेत. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी बुधवारी विद्यापीठाच्या प्रवेशद्वारासमोर ‘गांधीगिरी’ केली. बैठकीसाठी येणाऱ्या सर्व विधीसभा सदस्यांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले. तसेच कुलगुरूंकडून शैक्षणिक दहशतवादाच्या मुद्यावर स्पष्टीकरणाची मागणी करावी, अशी विनंती करण्यात आली.
अभाविप महानगर मंत्री वैभव बावनकर, सहमंत्री अमित पटले, समर्थ रागीट, करण खंडाळे, शिवेश हारगुडे इत्यादी कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. दुसरीकडे राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसतर्फे कुलगुरूंना ‘गेट वेल सून’चे पत्र पाठविण्याची मोहीम सुरू करण्यात येणार आहे. कुलगुरूंची मानसिकता बिघडली असून त्यांना वैद्यकीय उपचाराची आवश्यकता आहे. त्यामुळेच आम्ही त्यांना ‘गेट वेल सून’चे पत्र पाठवणार असल्याचे राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष शैलेंद्र तिवारी यांनी सांगितले.
गेल्या काही दिवसांपासून रातुम नागपूर विद्यापीठ विविध कारणांमुळे चर्चेत असून त्यात कुलगुरूंनी शैक्षणिक दहशतवाद विद्यापीठात सुरू असल्याचे वक्तव्य केले. प्रसार माध्यमांवर घालण्यात आलेली बंदी,परीक्षा भवनातील पैशांचा घोळ,सिनेट सदस्यांच्या प्रश्न विचारण्यावर आणण्यात आलेली बंदी इत्यादी विषय होते. या सर्व विषयांना घेऊन अभाविप तर्फे १२ मार्च रोजी पत्रकार परिषद घेण्यात आली होती. त्यात कुलगुरूंच्या वक्तव्याचा निषेध करण्यात आला व विधी सभेच्या बैठकीपूर्वी कुलगुरूंसाठी विशेष प्रार्थना करण्यात येईल असे घोषित करण्यात आले. त्यानुसार आज सर्व सिनेट सदस्यांचा प्रवेशद्वारावर गुलाब पुष्प देऊन ,सभेत विध्यार्थी हिताचे प्रश्न उचलावे अशी विनंती करण्यात आली.



Subscribe to Awaz VIdarbha Nagpur