
नागपूर: क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले नगर या झोपडपट्टीतील गरीब महिला. नाटक म्हणजे काय हे माहित नाही. अभियनाचा गंध नाही. मात्र संविधान दिनाचा जल्लोष साजरा होण्यापेक्षा संविधानाची कर्तव्ये जनमानसात रुजावी, या हेतूने पल्लवी वहाणे यांनी झोपडपट्टीतील महिलांना सोबत घेऊन पथनाट्य बसवण्याचा अफलातून प्रयोग साकारला. रंगमंचाशी ओळख नसलेल्या झोपडपट्टीतील महिलांना घेऊन “जाणीव संविधानाची’ हे पथनाट्य तयार केले आणि वंचित महिलांनी स्वतःचा रंगमंच उभारला. वस्ती-वस्तीमध्ये बाबासाहेबांचा विचार पेरण्यासाठी झोपडपट्टी फुटबॉलच्या धर्तीवर “अ स्लम ड्रामा’ या महिलांनी रंगमंचावर आणला.
पथनाट्य सुरू होताच, पंधरा वर्षांची शाळेत जाणारी मुलगी रंगमंचावर दिसते. केस पांढरे झालेली, चेहऱ्यावर सुरकुत्या पडलेली 55 वर्षांची आजीबाई दिसते. या नाट्यात भूमिका करणाऱ्या महिलांमध्ये कुणी मोलमजूरी करतात, तर कोणी शाळेत जातात. तर कोणी कोणी धुणी भांडी करतात. याशिवाय काठी टेकत-टेकत चालणारी आजीबाईदेखील पथनाट्यात दिसते.
“जाणीव संविधाना’ची या पथनाट्यातून पल्लवी वहाणे यांनी संविधानाने महिलांना दिलेल्या अधिकारापासून तर प्रत्येक महिलांची जबाबदारी सांगण्याचे काम लेखनातून केले आहे. पहिला प्रयोग सावित्राबाई फुले झोपडपट्टीतच सादर केला. यानंतर मध्यप्रदेशातील काजलवाणी, सौंसर येथेही प्रयोग झाले. येथील झोपडपट्टी या परिसराल रंगमंचाचे स्वरुप आले. नाटकात वर्षा गेडाम, मानसी पाझारे, प्रतिक्षा फुलझेले, कृष्णाबाई बागडे, नालंदाताई, रेणू गजभिये, रंजना तेलंग, रेखा मेश्राम, समिक्षा पानतावणे, सुनीता कांबळे, भारती भीमकर, सीमा बहादूरे, प्राजक्ता डांगरे यांनी अभिनय केला.
आधी “मोहीम’ आता, “जाणीव’
पल्लवी वहाणे यांनी गृहिणींना घेऊन अफलातून नाट्यचळवळीचे काम सुरू केले. यापुर्वी “रिपब्लिकन वसाहत’ आणि “न्यू कैलासनगर’ या वस्तीतील गृहिणींना घेऊन “मोहीम’ पथनाट्याचा प्रारंभ दीक्षाभूमीवरून केला. विविध वस्त्यांमध्ये सादर केले. या नाटकाचे पंचेवीस प्रयोग झाले. दुसरा प्रयत्न सावित्रीबाई फुलेनगर झोपडपट्टीतील महिलांना घेऊन “जाणीव संविधाना’ची हे पथनाट्य सादर केले. यानंतर भदन्त आनंद कौसल्यायनगरतील महिलांना घेऊन नवीन पथनाट्य उभे करणार आहेत. शहरातील झोपडपट्टीतील 100 महिलांचा रंगमंचावर प्रयोग सादर करण्याचा संकल्प त्यांनी सोडला आहे.
महिला अभिनयातून प्रामाणिक प्रयत्न
साऱ्या सामान्य गृहिणी आहेत. या महिलानां नाट्याचे तंत्र माहित नाही, रंगमंचावरचा प्रवेश कसा करायचा हे माहित नाही, तंत्र चूकले तरी चालेल परंतु विचार मोलाचा देणे हेच काम या पथनाट्याचे आहे. अंधश्रद्धा दूर करण्याचा, संविधानाच्या जनजागरणाचा, ख्रिस्तीधर्म प्रसारकांना रोखून धरण्याचा, बाबासाहेबांच्या विचारांना स्मरण करून हाती महिलांच्या हाती लेखनी देण्याचा प्रामाणिक प्रयत्न या महिला अभिनयातून करतात. नाटकाची तालीम म्हणजे काय हे माहित नसले तरी विचार पेरण्याचे काम करणाऱ्या महिलांचा सन्मान व्हावा.



Subscribe to Awaz VIdarbha Nagpur