
वर्धा: समझोता एक्सप्रेस बॉम्ब ब्लास्टचा निकाल नुकताच लागला,काँग्रेसने हे ठरवलेच होते या घटनेत हिंदूंना गोवण्याचे मात्र या निकालाने सत्य समोर आलं. काँग्रेसने हिंदू आतंकवाद शब्द वापरून शांतीप्रिय हिंदूंचा अपमान केला असे वक्तव्य पंतप्रधान नरेंद मोदी यांनी केले. वर्धा येथे अयोजित महासभेत ते बोलत होते. या प्रसंगी मंचावर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलताना मोदी म्हणाले, की काँग्रेसला या पापा पासून कधीही मुक्ती मिळणार नाही. काँग्रेसने देशाच्या मूळ धारेला निम्न लेखले. देशाने काँग्रेसला शिक्षा देण्याचं मन बनवलं आहे.पूर्ण विश्वाला बंधुत्वाची शिकवण देणाऱ्या हिंदूत्वाला काँग्रेसने ‘आतंकी’ सिद्ध केले. याचाच परिणाम म्हणून जिथे हिंदू बहुसंख्य आहेत तेथून ते पळाले आणि अल्पसंख्याक बहुल क्षेत्रात शरण घेतली. हजारो वर्षांच्या इतिहासात आजपर्यंत कधीही हिंदू आतंकवाद शब्द उच्चारला गेला नव्हता. इंग्रजांनी इतके वर्ष शासन केले पण त्यांनीही हा शब्द उच्चारला नाही मात्र देशाचे गृहमंत्री आणि महाराष्ट्राचे सपूत सुशीलकुमार शिंदे यांनी पहिल्यांदा हिंदू आतंकवाद शब्द उच्चारला,हे पाप त्यांनी केले. अश्या काँग्रेसला तुम्ही निवडून देणार का? हा प्रश्न मोदी यांनी केला. आज आतंकवाद असो किंवा नक्षलवाद त्यांचा प्रभाव कमी झाला आहे,काँग्रेसने मात्र देश विघातक ताकतीला नेहमी हवा दिली. याच विदर्भाच्या भूमीत काँग्रेसने डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचाही पराभव केला,त्यांचा अपमान केला. त्यांच्या हातात असते तर त्यांनी देशाच्या इतिहासातून डॉ.आंबेडकरांचे नावच गायब केले असते. ते फक्त मजबुरी म्हणून आबेडकरांचे नाव घेतात. माझी टिंगल करताना विरोधी पक्ष मला ‘शोचाल्याचा चौकीदार’ म्हणतात, मी शोचालयाच्या चौकीदारी सोबतच आई- बहिणीच्या इभ्रतीचीही चौकीदारी करतो.रात्रीच्या अंधारात त्यांना घरा बाहेर पडावे लागते, नाही तर दिवसभर त्रास सहन करावा लागतो, काँग्रेस याचीही टिंगल उडवते,कामाच्या परिश्रमाचा अपमान करते,अश्या लोकांना निवडणुकीत उत्तर देण्याचे आव्हान मोदी यांनी केले.
मोदी यांनी महाराष्ट्रात आपल्या प्रचाराचा नारळ गांधी विनोबांची भूमी वर्धा येथून फोडला. याबाबत त्यांनी ट्विट देखील केले. मैदानात प्रचंड जनसागर उमडला होता. ४३ डीग्री तापमानात एवढया प्रचंड संख्येने उपस्थित राहणाऱ्या जनसमूहाचे मोदींनी आभार मानले.
काँग्रेस-राष्ट्रवादी गटबंधन कुंभकर्णी
काँग्रेस-राष्ट्रवादी गटबंधन कुंभकर्णी असल्याची टीका यावेळी मोदी यांनी केली. हे गटबंधन सत्तेत असतात तेव्हा ६-६ महीने झोपतात. पवार स्वतःला शेतकरी म्हणतात मात्र ते कृषी मंत्री असताना सर्वात जास्त शेतकरी आत्महत्या घडल्या. मावळची घटना घडली.हे गटबंधन कधीच जनतेचे भले करू शकत नाही. पवार हे कोणतेही काम विचार केल्या शिवाय करत नाही म्हणूनच आधी त्यांनी निवडणूक लढवण्याची आणि नंतर माघार घेण्याचा ‘विचारपूर्वक’ निर्णय घेतला.‘हवा का रुख किस तरफ बह रहा है’ हे त्यांनी नेमके ओळखले. या वेळी देशातील जनतेने चांगल्या-चांगल्या लोकांना मतदानापूर्वीच घरी बसवले. राष्ट्रवादी मध्ये तर पुतण्या आणि नातूनेच पक्ष ‘हायजॅक’ केल्याची कोटी मोदींनी केली. जनतेनेच पवार साहेबांना बोल्ड केले असे ते म्हणाले. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या अनेक योजना फक्त जनतेला लुटण्यासाठीच होत्या असा आरोप त्यांनी केला,तुम्हाला देशाचे हिरो पाहिजे की पाकिस्तानचे? असा सवाल मोदी यांनी केला.
महाराष्ट्रात शत प्रतिशत भाजपाला निवडून देण्याचे आव्हान यावेळी त्यांनी केले. महाराष्ट्र ही वीरांची,संतांची आणि शिवाजी महाराजांची भूमी असल्याचे ते म्हणाले,यावेळी ‘मैं भी चौकीदार’ असा नारा त्यांनी जनसमूहाकडून वदवून घेतला.



Subscribe to Awaz VIdarbha Nagpur