
नागपूर: औरंगाबादमध्ये एमआयएमला चांगेल यश मिळाले आहे. हा पक्ष वाढताना दिसत आहे. शिवाय औरंगाबादमध्ये अब्दुल सत्तार यांच्यासारख्या नेत्यांनीही पक्षाविरोधात बंड केले आहे. अशा स्थितीत काँग्रेस पक्षाने योग्य विचार करण्याची गरज होती. समाजाला सोबत घेऊन वाटचाल करा, असे पक्षश्रेष्ठींचे आदेश आहेत. असे असतानाही यावेळी काँग्रेसच्या नेत्यांनी अल्पसंख्याक, आदिवासी आणि दलितांना विश्वासात न घेताच तिकीट वाटप केले आहे, अशा शब्दांत काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री अनिस अहमद यांनी आपली नाराजी उघड केली आहे.
लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील उमेदवारी अर्ज भरण्याच्या आज शेवटच्या दिवशी अहमद यांनी उमेदवारीवरून आपल्याच पक्षावर टीकास्त्र सोडले आहे. लोकसभा निवडणुकीत उमेदवारी देताना काँग्रेस पक्षाने अल्पसंख्याक, आदिवासी आणि दलित समाजाला डावललं असल्याची टीका अनिस अहमद यांनी केली आहे. वाढणाऱ्या एमआयएम पक्षाला वेळीच रोखायचे असेल तर याचा नक्कीच विचार करावा लागेल, असे सांगताना यावेळी पक्षाने एकतर्फी निर्णय घेत तिकीटवाटप केल्याचेही अहमद म्हणाले. सध्या काँग्रेस पक्षात सर्वसामान्य जनतेला न्याय मिळेनासा झाला आहे असेही अहमद यांचे म्हणणे आहे.
मुस्लिम समाजाची मते ही आपल्यासाठीच राखून ठेवलेली मत आहेत असे काँग्रेसने समजू नये असेही अहमद म्हणाले. मु्स्लिम समाजाला गृहित धरणे चुकीचे असल्याचेही ते म्हणाले. या बरोबरच लोकसभा निवडणुकीच्या उमेदवाऱ्या ठरवताना पक्षाने आदिवासी आणि दलित समाजालाही काँग्रेसने बाजूला सारले आहेत. शिवाय जे खरे दलित नेते आहेत त्यांनाच पक्षाने डावलले असल्याचे अहमद म्हणाले. थोडक्यात काँग्रेसने स्थानिक उमेदवारांना डावलून भंडारा-गोंदियातील आयातीत उमेदवार नाना पटोले यांना लोकसभेची उमेदवारी दिली असल्याने अनिस अहमद यांनी काँग्रेसला दिलेला घरचा आहेर म्हणजे अप्रत्यक्षरित्या नाना पाटोलेंचा विरोध मानल्या जात आहे.



Subscribe to Awaz VIdarbha Nagpur