
‘देअर मस्ट बी वे आऊट’
डॉ.ममता खांडेकर
(Senior journalist)
दि.४ जानेवारी रोजी आयोजित १६ ‘शोध मराठी मनाचा’ १६ वे जागतिक मराठी संमेलन नागपूर येथे भरले. संमेलनाच्या अध्यक्ष् पदी श्रीनिवास ठाणेदार नावाची अलौकीक विभूती विराजमान होती. बातमी करण्यासाठी गेले असता श्री सोबत भेट झाली.तत्पूर्वी आदल्या दिवशी पत्र-परिषदेत त्यांचे विचार ऐकूनच प्रभावित झाले होते. बेळगाव सारख्या शहरातून थेट अमेरिकेत अटकेपार झेंडे फडकवणारा नक्कीच तो सामान्य नव्हता. त्याच्या अध्यक्षीय भाषणाची केवळ उत्सुक्ताच नव्हती तर त्याच्यातल्या ‘प्रतिभावान’ माणसाला समजून घेण्याची तळमळ मला स्वस्थ बसू देत नव्हती. लगेच त्याचं ‘ही श्री ची ईच्छा’ पुस्तक एका दमान तिथल्या तिथे वाचून काढलं आणि….श्री नावाच्या या अवलियासमोर मी नतमस्तक झाले. जिच्या सहकार्याने आयुष्याची लढाई लढत होता तिनेच दोन लहान मुलांचा विचारही न करता आत्महत्या केली. परदेशात कोसळलेलं हे दू:ख सहन करुन यातून मार्ग काढणे सामान्य कुवतीच्या माणसाला झेपवलंच नसतं. मात्र श्री यातूनही सावरला. त्याचं जगणं हे इतरांसाठी प्रेरणादयीी ठरले.
नाव श्रीनिवास ठाणेदार ,वय वर्ष ६३,जन्म बेळगाव येथील,सध्या अमेरिकेत यशस्वी उद्योजक म्हणून यशाची पताका उंचवतात आहेत मात्र हे सर्व यश सहज मिळाले नाही तर साध्या कारकुनाच्या या मुलाने मराठी माणसाचे कौशल्य किती खोलात असते याची प्रचितीच जणू अमेरिकेला दाखवुन दिली!
‘अपयश’ दोन मार्गाने स्वीकारता येतात,पाहिला मार्ग म्हणजे निराश होऊन स्वस्थ बसा तर दुसरा मार्ग अपयशाला ‘संधी’समजा, श्रीनिवास यांनी दुसरा मार्ग स्वीकारला. आपल्या ध्येयवेड्या आत्मविश्वासाने त्यांनी फक्त अमेरिकेत व्यवसायच नाही सुरू केला तर ४५० अमेरीकन तंत्रज्ञान तज्ज्ञांना कामावर ठेवले मात्र जागतिक मंदीमध्ये त्यांचा कारखाना मोडकळीस निघाला,तेव्हा देखील त्या 55 वर्षाच्या ‘तरुणाने’ पुन्हा शून्यातून सुरवात केली. गमावलेले पुन्हा कमावले,मराठी माणसामध्ये आत्मविश्वासाची कमी नसते,जो जितका खोलात जाईल तेवढाच वर येतो हे श्रीनिवास यांनी सिद्ध केले. आपण इतरांच्या अपयशातून खूप काही शिकू शकतो. त्यांनी आपल्या ‘ही तर श्री ची ईच्छा’ या पुस्तकात आपल्या अफाट यशाचं वर्णन केलं, एवढेच नव्हे तर जागतिक मराठी संमेलनात त्यांच्या पुस्तकाची ५० सा वी आवृत्ती ‘ पुन्हा श्री गणेशा’चे विमोचन,झाले. साहित्य हे दुसऱ्यांच्या जीवनात परिवर्तन घडवून आणणारे असावे असे ते सांगतात. परिस्थितीसमोर हार मानायची की नाही हा वृत्तीचा प्रश्न आहे, वाट कशी काढायची हे दृष्टिकोनावर अवलंबून असते, मराठी माणूस थोडा संतुष्ट असतो त्याने अस्वस्थ असायला हवे असे श्री सांगतात. १९८९ मध्ये जेव्हा त्यांनी भारत सोडले तेव्हा त्यावेळी भारतात संधी नव्हत्या,आज मात्र आपल्या देशाने फार मोठी प्रगती गाठली असून सत्ता कोणतीही असो या प्रगतीत सर्वच राजकीय पक्षांचा सहभाग असल्याचे सांगून सध्या भारतात गाजत असलेल्या ‘असहिष्णुता’ च्या प्रश्नाला त्यांनी बगल दिली. अमेरीका हा स्थलांतरितांचा देश आहे,भारतीय तरुणांशिवाय तिथले तंत्रज्ञान चालतच नसल्याचे ते म्हणाले,शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बोलताना शेतकऱ्यांचे मनोधेर्य वाढवण्याची तसेच शेतीमध्ये नवे तंत्रज्ञान वापरण्याबाबतची जागरूकता निर्माण करण्याची गरज त्यांनी प्रतिपादित केली. अमेरिकेतील बृहन् महाराष्ट्र् मंडळाचे ते अध्यक्ष देखील आहेत. एका निवडणुकीत डेमोक्रॅटिक पक्षातर्फे गव्हर्नर पदाची निवडणूक लढवली असता 5 लाख मतदारांपैकी श्री यांना दोन लाख मते मिळाली यावरून अमेरिकेतील लोकशाहीचा प्रत्यय येतो,बाहेरच्यानांही तेथील मतदार अमेरिकन म्हणूनच स्वीकारतात अश्या आठवणी त्यांनी सांगितल्या.
उद्योगात पडण्याचा उद्योग करुन नयेत,अन्यथा त्यास ‘नसते उद्योग’जाहीर करु,असं बजावू पाहणार्या मराठी समाजाचे आपण सारे घटक असल्याचे ते सांगतात. नोकरीसुद्धा निमुटपणे करण्याची मानसिकता असणाऱ्या सरळमार्गी मराठी लोकांनी उद्योगात येण्याची भाषा करणं म्हणजे महापाप केल्यासारखं वाटावं,अशा काळात श्री यांनी उद्योगात भरारी घेतली ती ही थेट परदेशात! मनात काही तरी करण्याची उर्मी होती.इच्छाशक्ती प्रचंड होती. स्वप्नं पाहायला आवडत होतं आणि पाहिलेलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी जिवापार प्रयत्न करण्याची जिद्दही होती. खिशात पैशे नव्हते पण मनात स्वप्नं भरलेली होती. समोर ध्येय होतं,हेतू होता, नकार आला की त्याविरुद्ध बंड करणारं मन ही श्री यांना लाभलं होतं. हे बंड म्हणजे पुन्हा पुन्हा जिद्दीने प्रयत्न करणारे बंड होते.शिक्ष् णासाठी अमेरिकेत जाण्यासाठी धाडस करुन केलेले व्हीसा अर्ज तब्बल चार वेळा नाकारण्यात आला! तरीही चिकाटी सोडली नाही. जर दोन वेळाच प्रयत्न करुन अमेरिकेत जाण्याचा विचारच रद्द केला असता तर! मी श्री ठाणेदार नावाचा कोणी भारतीय अमेरिकेत शिकला नसता, तिथं व्यवसाय करु शकला नसता आणि मिशिगनसारख्या प्रमुख राज्याच्या गव्हर्नरपदी निवडणूकही लढू शकला नसता.
२००८ साली अवघ्या अमेरिकेत मंदीचं सावट पसरलं. काही वर्षांपूर्वी,अवघ्या चार लोकांची जी कंपनी त्यांनी विकत घेऊन नव्याने उभारली होती, सुमारे ४००-५०० ’अमेरिकन’ शास्त्रज्ञ ज्यात काम करत होते,कंपनीचं नेटवर्थ ही चांगलं होतं तरीही मंदीच्या भीतीने श्री यांची कंपनी ताब्यात घेण्यात आली आणि इतक्या वर्षा उभारलेलं सारं काही पत्त्याच्या बंगल्यासारखं कोसळलं. अलीशान गाड्या,एखादा राजमहाल सारखा बंगला..सारं काही गमावलं. तीच निराशा…पुन्हा सारं शुन्यातून उभारणं म्हणजे काय? पुन्हा एका साध्या घरात बिऱ्हाड थाटलं.बेळगाव-मुंबई पासून मिशिगन अशी प्रवास केलेली जुनी निळी सुटकेस दृष्टिस पडली. त्यातील जुन्या पुस्तकातून राजा शिवछत्रपतींचं पुस्तक हातात पडलं. छत्रपती शिवाजी महाराज..ज्यांचं संपूर्ण आयुष्यच संघर्षात गेलं. प्रत्येक टप्प्यात आलेली मोठमोठी संकटं आणि त्यावर महाराजांनी केलेली मात. मग आग्रयाहून झालेली सुटका वा जीवावर बेतलेल्या कित्येक संकटांची मालिका..महाराजांनी अडचणीच्या प्रत्येक क्ष् णी काय विचार केला असेल..यातून नक्कीच काहीतरी मार्ग निघेल ‘देअर मस्ट बी वे आऊट’..बस्स..हे शब्द मनात घुसले..या शब्दांनी नैराश्य दूर केलं आणि परिस्थितीतून बाहेर कसं पडता येईल,यावर लक्ष् केंद्रित झालं आणि खरोखर मार्ग सापडला आणि गेलेले सारे वैभव,मानप्रतिष्ठा पुन्हा श्री यांनी जिद्दीने प्राप्त केल्याचे पुस्तकात नमूद करतात. ‘देअर मस्ट बी वे आऊट’ हा शिवाजी महाराजांच्या मनात चालणारा विचार, माझ्यासारख्या सामान्य माणसाला मंत्रासारखा भासला. चरित्रांमधून,शब्दांमधून का होईना महाराज आपल्या आयुष्यात आलेच नसते आणि त्या क्ष् णी तो मंत्र सापडला नसता तर..या नुसत्या विचारांनी अंगावर काटा उभा राहतो. त्याचवेळी अभिमान वाटतो..मराठी असल्याचा.
हे मराठीपण, हा मराठी बाणा आपली खरी प्रेरणा असल्याचे हा अमेरिकिन मराठी माणूस सांगतो. नागपूर विद्यापीठातून बायोलाॅजी व केमिस्ट्रीमधून बी.एस.सी करणाऱ्या स्वाती दांडेकर या आयोवा राज्यात सिनेटर म्हूणन राहील्या. पद् मभूषण रघूनाथ माशेलकर हे आपले महान शास्त्रज्ञ. ३९ डॉक्टरेट्स लाभलेले,२८ हून अधिक पेटंटस् प्राप्त झालेले प्रेरणास्त्रोत. अमेरिकेतील नॅशनल अकॅडमी ऑफ इन्वेंटर्स(एनआयए)वतीने फेलोशिप देण्यात आलेले पहिले भारतीय म्हणून इतिहासात नोंद झाली. सी डॅक च्या माध्यमातून देशात संगणक शिक्ष् णाला दिशा देणारे आणि परम सुपरकॉम्प्युटरच्या माध्यमातून जगाला भारतीय संगणकशक्तीची दखल घ्यायला भाग पाडले असे आपले सर्वांचे मार्गदर्शक पद्मभूषण डॉ.विजय भटकर..आपल्या विदर्भातूनच अमरावतीतील शाळेतून शिक्ष् ण घेऊन बोईंगसारख्या विमान कंपनीत व्हाईस चेअरमनपद भूषविणारे दिनेश केसकर..किती नावे घ्यावीत? भारतात जन्म घेऊन कर्मभूमीत सर्वोच्च स्थानी गेलेले मराठी लोकांच्या रुपाने दिसणारा आशावादच नव्हे का?
तरुणाईला संदेश देताना श्री सांगतो तुमच्याकडे कौशल्य आहे,प्रतिभा आहे,तुमच्याकडे खूप काही आहे..फक्त जरासं धाडस आणि आत्मविश्वास हवा. तुम्हाला स्वत:ला सिद्ध करण्याची संधी आपोआप येत राहतील. खरी शक्ती कोणती असेल तर ती आहे ‘इच्छाशक्ती’.अशक्य वाटणाऱ्या र्गोष्टी,केवळ इच्छाशक्ती मिळवून देऊ शकते. आपण प्रामाणिक आहोत. आपल्याकडे कौशल्यही आहे,आपण हुशारही आहोत. हवं आहे फक्त जरासं धाडस आणि आत्मविश्वास. आत्मविश्वास असेल तर कशाचीही पर्वा करु नका. मराठी असल्याचा न्यूनगंड बाळगू नका.अभिमान बाळगा. मात्र,त्याचवेळी जगाच्या चालीरिती शिका.अन्य समाजघटकातही मिसळा. जे जे चांगलं आहे,सकारात्मक आहे ते स्वीकारा. नकारात्मक लोक,संकुचित मानसिकतेत अडकरऱ्या र्गोष्टीसोडा. तुम्हाला उद्योगात यायचे असेल तर ‘प्रचंड संधी आहे’. त्यासाठी तुम्हाला स्वत:त बदल घडवावे लागतील. कदाचित कष्ट अधिक पडतील. संयम सोसावा लागेल तरीही चिकाटीनं पुढं जा.प्रामाणिकपणा सोडू नका.अजूनही जगात प्रामाणिकतेला पैशांपेक्ष् अधिक किंमत आहे, असे श्री अनुभवातून तरुणाईला सांगतात. परदेशातील आपल्या ‘मराठी’ बांधवांना आजही त्यांच्या पुढच्या पिढीवर मराठीतच संस्कार व्हावेेत असं आवर्जून कां वाटत असावं? याचं उत्तर दडलं आहे आपल्या समृद्धित.ही समृद्धि आहे वाचन,विचार आणि वर्तनातून जतन झालेल्या संस्कृतीची. म्हणून ही मराठमोळी संस्कृती टिकवण्याची धडपड आपापल्या पद्धतीने जगभरातील मराठी बांधव करीत असतात. बेळगाव महाराष्ट्रात येईल किंवा नाही हे माहिती नाही.पण बेळगावातला कोणी एक देशाबाहेर जाऊन तेथे महाराष्ट्र धर्म वाढवू पाहतोय… आणि हेच खरे सामर्थ्य आहे. आपल्या ‘मराठी‘संस्कृतीचे. आम्ही सारे मराठीजन एकमेकांच्या ह्दयात वसतो. कधी कलाकार, कधी लेखक, कधी उद्योजक,कधी गायक,कधी कवी,कधी संगीतकार तर कधी वक्ता,कधी श्रोता तर कधी मनोमन दाद देणारा रसिक..आम्हा सर्वांच्या आत वसतो.
ज्ञानेश्वरांची ज्ञानेश्वरी, तुकोबांची गाथा, विनोबांची गीताई, तुकडोजीची ग्रामगीता हे सारं आमच संचित आहे. संपूर्ण विश्वाच्या कल्याणाचा विचार करणाऱ्या संतांचा वारसा आम्हाला लाभलेला आहे. विश्वाचं कल्याण व्हावं,ही चिरंतन इच्छा हाच आपल्या चिंतनाचा गाभा आहे. आपलं वेगळंपण त्यातच दडलेलं आहे आणि तोच आपल्या उत्कर्षाचा संदेशही आहे असं श्री आवर्जून आपल्या अध्यक्षीय भाषणात सांगून गेलेत.



Subscribe to Awaz VIdarbha Nagpur