नागपूर : मतदार यादीत नाव नसले तरी आधार कार्ड किंवा मतदार ओळखपत्र दाखवून चॅलेंज वोटच्या तरतुदीनुसार मतदान करता येईल, हे विधान वस्तुस्थितीशी विसंगत असून मतदार यादीत नाव असल्याशिवाय कोणालाही मतदान करता येणार नाही. तसेच प्रदत्त मत (टेंडर वोट) बाबतही चुकीची माहिती पोस्टमध्ये नमूद आहे. एकूण मतांमध्ये 14 टक्के टेंडर वोट असल्यास संबंधित मतदान केंद्रांवर फेरमतदान (रीपोल) घेण्यात येईल,हे विधान देखील वस्तुस्थितीला धरून नसून अशी कोणतीही तरतूद नसल्याचे मुख्य निवडणूक अधिेकारी कार्यालयाने स्पष्ट केले आहे

निवडणूक प्रचार साहित्य प्रमाणित करणे बंधनकारक-अश्विन मुदगल
लोकसभेच्या निवडणुकीसाठी नागपूर व रामटेक मतदार संघातील उमेदवार तसेच पक्षासाठी प्रचार करताना सर्व प्रचार साहित्यासाठी जिल्हा माध्यम संनियंत्रण व प्रमाणीकरण समितीतर्फे प्रमाणपत्र घेणे बंधनकारक आहे. तसेच सर्व बल्क एसएमएस पाठविण्यापूर्वी प्रमाणित करणे आवश्यक असून न करणाऱ्या उमेदवारांविरुद्ध निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार कारवाई करण्यात येईल, असे निर्देश जिल्हा निवडणूक अधिकारी तथा एमसीएमसी समितीचे अध्यक्ष अश्विन मुदगल यांनी दिलेत.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जिल्हा एमसीएमसी समितीची बैठक जिल्हा निवडणूक अधिकारी अश्विन मुदगल यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. बैठकीत रामटेक लोकसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी श्रीकांत फडके, उप जिल्हा निवडणूक अधिकारी राजलक्ष्मी शहा, निवासी उपजिल्हाधिकारी व समितीचे सदस्य रवींद्र खजांजी, नोडल अधिकारी अनिल गडेकर, समितीचे सदस्य पोलीस उपायुक्त श्वेता खेडकर, गौरी मराठे, सायबर तज्ज्ञ राकेश माखेजा, यशवंत मोहिते, ज्येष्ठ पत्रकार राहुल पांडे, मोईज हक, विजय करे, झाकीर पठाण आदी उपस्थित होते.लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी भारत निवडणूक आयोगाच्या जिल्हा एमसीएमसी समिती गठित करण्यात आली असून या समितीमार्फत मुद्रित, इलेक्ट्रॉनिक तसेच सर्व समाज माध्यमांवर निवडणुकीसंदर्भातील जाहिरातीसाठी वापरण्यात येणाऱ्या साहित्याची प्रमाणीकरण करण्यात येते. या समितीमार्फत रामटेक व नागपूर लोकसभा मतदार संघातील जाहिरात, होर्डिंग्ज आदी मुद्रित माध्यमांच्या ३६ उमेदवार प्रतिनिधी व पक्षांना प्रमाणपत्र देण्यात आले आहेत. तसेच इलेक्ट्रॉनिक माध्यमावरील २३ उमेदवारांच्या प्रचार साहित्यांना समितीमार्फत प्रमाणित करण्यात आले आहे.
एसएमएस सर्व्हिस प्रोव्हाईड करणाऱ्या ११७ कंपन्या आहेत. त्यापैकी पाच कंपन्या नागपूर व रामटेक परिसरात बल्क एसएमएसची सेवा देत असून या सर्व कंपन्यांनी जोपर्यंत एमसीएमसी समितीमार्फत प्रमाणित केल्याचे प्रमाणपत्र सादर करणार नाही तोपर्यंत उमेदवार अथवा राजकीय पक्ष एसएमएस स्वीकारु नये, अन्यथा निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार कारवाईस पात्र ठरतील, असे निर्देशही जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी यावेळी दिले. यावेळी पेड न्यूज विविध माध्यमांद्वारे सुरु असलेला उमेदवार अथवा पक्षाचा प्रचार सोशल मीडियावरील विविध माध्यमाद्वारे होत असलेला प्रचार इलेक्ट्रॉनिक माध्यम, केबल टीव्ही यावरील प्रचारासंदर्भात आढावा घेऊन प्रत्येक प्रचार साहित्य प्रमाणित झाले किंवा नाही यासंदर्भातही आढावा घेण्यात आला.



Subscribe to Awaz VIdarbha Nagpur