
नागपूर :लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानाला अवघे दोन दिवस शिल्लक राहिले आहे. रविवार पहिल्या टप्प्यातील प्रचाराचा शेवटचा रविवार असल्याने, सर्वच राजकीय पक्षांनी आपली शक्ती पणाला लावली. नागपूरच्या रणरणत्या उन्हाने देखील सर्वच राजकीय पक्षाच्या नेत्यांचा,पदाधिकाऱ्यांचा आणि कार्यकर्त्यांचा चांगलाच घाम गाळला. सुर्योदया पासून सूर्यास्त नंतरही मध्यरात्री पर्यंत कार्यकर्ते भूक,तहान विसरून निवडणुकीच्या हंगामात राब राब राबतात आहेत, सूर्याच्या आग ओकणाऱ्या गर्मी समोर, वाहणाऱ्या घामाच्या धारेत न्हाऊन आपापल्या पक्षाचा झेंडा खांद्यावर घेऊन नागपुरातील एकूण ३० उमेदवारांचे हे खंदे समर्थक आणखी दोन दिवस परिश्रमाची आहुती निवडणुकीच्या यज्ञात वाहणार आहेत.११ तारखेला परिश्रमाचं हे होम कोणाच्या भाग्यात शुभ ठरतो हे २२ में रोजीच उघड होईल.
लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान ११ तारखेला होणार आहे. प्रचाराच्या तोफा अवघ्या काही तासानंतर थांबणार असल्याने, सर्वच राजकीय पक्षांनी प्रचारासाठी आपली शक्ती पणाला लावली आहे. त्यातल्या त्यात आज पहिल्या टप्प्यातील प्रचाराचा शेवटचा रविवार आहे. त्यामुळे नागपूरसह विदर्भात अनेक नेत्यांची तब्बल दोन पेक्षा जास्त जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामध्ये काँग्रेस, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना यासह बहुजन रिपब्लिकन पार्टी आणि वंचित बहुजन आघाडी उमेदवारांच्या प्रचाराने अक्षरशः रान उठविले आहे. पहिल्या टप्प्यातील प्रचाराचा रविवार शेवटचा असल्याने, कोणत्याही पक्षाने मतदारांपर्यंत पोहोचण्याची कोणतीही संधी सोडलेली नाही.



Subscribe to Awaz VIdarbha Nagpur