
लातुर:मी तसे वक्तव्य केलेचं नाही. ते वक्तव्य म्हणजे वाक्यांची जुळवाजुळव होती, असे सांगत भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. सोमवारी एका कार्यक्रमात त्यांनी भारतामधील ४० अतिरेक्यांना(जवानांना) मारल्याचे विधान केले होते. मात्र, तसे विधान केलेच नसल्याचेल स्पष्टीकरण दानवेंनी दिले.भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे पुलवामा येथे शहीद झालेल्या CRPF जवानांना अतिरेकी म्हणत असतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला असून सोशल मीडियावर टिकेची झोड उठत आहे.
पाकिस्ताने आपले ४० अतिरेकी मारले आणि त्या बदल्यात आपण त्यांचे ४०० अतिरेकी मारलेत, असे वादग्रस्त वक्तव्य बोलण्याचा ओघात ते करून गेले मात्र हा व्हिडीओच बनावट असल्याचे ते आता सांगत आहेत. खा. दानवे यांच्या वक्तव्याचा बनावट व्हिडीओ तयार करून त्यांची बदनामी केल्याचा खुलासा प्रदेश भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्येय यांनी केला. सोमवारी सोलापुरात भाजपच्या विजयी संकल्प मेळाव्यात बोलताना दानवे यांच्या तोंडून ‘जवान’ यांच्या ऐवजी ‘अतिरेकी: शब्द उच्चारला गेला . दानवे यांनी भाषणात झालेली चूक लगेच सुधारून घेतली असली तरी भाषणाचा व्हिडीओ लगेच सोशल मीडियावर व्हायरल झाला. यपुर्वी देखील वादग्रस्त वक्तव्यामुळे दानवे अडचणीत आले होते.-शेतकऱ्यांबद्दल बोलताना त्यांनी ‘साले’ शब्द वापरल्याने त्यांच्यावर जोरदार टीका झाली होती.
लातुरात लोकसभेचे उमेदवार सुधाकर शृंगारे यांच्या उमेदवारी अर्ज सादर करताना भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे उपस्थित होते. यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते.
काँग्रेसने केला तीव्र निषेध
काँग्रेसने दनवेंच्या वक्तव्याचा निषेध केला आहे.भाजपचे नेते लष्कराच्या बलिदानाचे राजकारण करीत आहेत. भाषणाच्या तोऱ्यात दानवे यांना आपण काय बोलतो आहोत हे कळायला हवे होते.त्यांनी माफीही मागितली नाही यावरून त्यांची विकृत मानसिकता दिसून येते,अशी टीका काँग्रेसने केली आहे.शहिदांना अतिरेकी म्हणणारा तसेच साले म्हणून अन्नदात्याचा अवमान करणारा दानवच असू शकतो मानव नाही. अशा तीव्र शब्दांत सैनिकांचा अवमान करणा-या रावसाहेब दानवेंचा निषेध करून भाजपला काही शरम असेल तर त्यांनी तात्काळ दानवेंची प्रदेशाध्यक्ष पदावरून हकालपट्टी करावी अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली आहे.
या संदर्भात बोलताना सावंत म्हणाले की, सैनिकांचा अवमान करण्याची भाजपची परंपरा राहिली आहे. नरेंद्र मोदी यांनी व्यापारी सैनिकांपेक्षा जास्त धोका पत्करतात असे बोलून सैनिकांचा अवमान केला होता. भाजपचे आमदार प्रशांत परिचारक यांनी तर अश्लाघ्यपणाचा कळस गाठून सैनिकांबाबत अत्यंत हीन वक्तव्य केले होते, याचा जाहीर निषेध काँग्रेस पक्षाने पूर्वीही केला आहे. रावसाहेबांचे व्यक्तीमत्व भाजपच्या दानव संस्कृतीला साजेशे आहे. या अगोदरही त्यांनी निवडणुकीत लक्ष्मी दर्शन करण्याकरिता मतदारांना आवाहन केले होते. तसेच तुम्ही मला मते द्या मी तुम्हाला पैसे देतो असे म्हणण्यापर्यंत त्यांची मजल गेली होती. भाजपात अशा दानव विचारधारेच्या लोकांचा सुकाळ असून या दानव भाजपचा राजकीय अंत देशातील जनताच करेल असा विश्वास काँग्रेस प्रवक्त्यांनी व्यक्त केला.



Subscribe to Awaz VIdarbha Nagpur