जलप्रदाय व स्थावर विभागात आमूलाग्र बदल करणार- वीरेंद्र कुकरेजा

नागपूर: महापालिकेतील अधिकारी कामाप्रति संवेदनशील नाहीत, असा निष्कर्ष स्थायी समिती अध्यक्ष वीरेंद्र कुकरेजा यांनी नोंदवला. जलप्रदाय व स्थावर विभागात आमूलाग्र बदल करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. दोन्ही विभागांत राज्य सरकारतर्फे अधिकारी नियुक्ती करण्याच्या आवश्यकतेवरही त्यांनी भर दिला आहे.
स्थायी समितीच्या बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत कुकरेजा बोलत होते. वर्षभराचे निरीक्षण नोंदवीत त्यांनी उत्पन्न वाढत नसल्याची कारणे स्पष्ट करताना अधिकाऱ्यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले. मालमत्ता कर विभागातील अधिकारी स्वयंस्फूर्तीने वसुली करीत नाहीत. त्यांना कायम वरिष्ठ अधिकारी किंवा पदाधिकाऱ्यांकडून फैलावर घ्यावे लागते. तेव्हाच ते कामे करतात. ही वृत्ती महापालिकेच्या उत्पन्नाला मारक आहे. एवढेच नव्हे, तर महापालिकेचे आर्थिक नुकसान होत असेल तर त्याकडेही ते दुर्लक्ष करतात. नुकसान टाळण्यासाठी कुठलीही कल्पना त्यांच्याकडे नसते, असे नमूद करीत कुकरेजा यांनी या वर्षभरात ऑरेंज सिटी स्ट्रीटचे भूमिपूजन महत्त्वाची बाब असल्याचे सांगितले. केळीबाग मार्गाचे काम सुरू होणेही वैशिष्ट्यपूर्ण असल्याचे ते म्हणाले. याशिवाय घनकचरा व्यवस्थापनासाठी बायोमायनिंगचा प्रकल्पही महत्त्वाचा असल्याचे ते म्हणाले.
यावेळी राज्य सरकारकडून विशेष अनुदानाअंतर्गत १७५ कोटी आणखी मिळणार असल्याचे कुकरेजा यांनी सांगितले. राज्य सरकारचे महापालिकेला मोठे आर्थिक सहकार्य मिळाले. जीएसटी अनुदानाच्या वाढीसाठी पाठपुरावा केला. यात यश मिळाले. महापालिकेला विशेष अनुदान देण्यासाठी राज्य सरकारने वेगळे खाते काढले असल्याची माहितीही त्यांनी दिली.



Subscribe to Awaz VIdarbha Nagpur